दौंड तालुक्यातील पत्रकार अक्षय देवडे यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान

आवाज लोकशाहीचा ..

दौंड प्रतिनिधी …


दौंड तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्रामीण भागाशी निगडीत विविध प्रश्नांवर निर्भीडपणे आणि सातत्याने लेखन करणारे दैनिक पुढारीचे पत्रकार अक्षय देवडे यांना ‘ग्रामीण पत्रकारिता संघनायक गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.

ग्रामीण पत्रकारितेला बळ देणारे आणि समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या देवडे यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मूकनायक मैत्री संघ आणि दि पिपल्स वेलफेअर अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या ऐतिहासिक पाक्षिकाच्या ९९ व्या वर्षपूर्ती निमित्त तसेच साप्ताहिक संघनायकच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त या विशेष पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

अक्षय देवडे यांनी मागील १२ वर्षांपासून दैनिक पुढारीमध्ये कार्यरत राहून ग्रामीण पत्रकारितेला नवे परिमाण दिले आहे. त्यांच्या लेखणीतून ग्रामीण भागातील मूलभूत समस्या प्रभावीपणे मांडल्या गेल्या आहेत. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या अत्यावश्यक सुविधांपासून ते बेरोजगारी, स्थलांतर, महिला व बालविकास, सामाजिक अनिष्ट प्रथा, ग्रामीण राजकारण, प्रशासन, ग्रामपंचायत कामकाज, सहकारी संस्था, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्याने निर्भीडपने लिखाण त्यांनी केले आहे.

त्यांच्या पत्रकारितेची खासियत म्हणजे केवळ बातमी देण्यापुरते मर्यादित न राहता समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर प्रकाश टाकणे आणि प्रशासनाला जागे करण्याची ताकद त्यांच्या लेखणीत आहे. अनेक वेळा त्यांच्या बातम्यांमुळे स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन प्रश्न मार्गी लावले असल्याचेही दिसून आले आहे.

पत्रकारिता क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत अक्षय देवडे विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय असतात. युवकांमध्ये जागृती निर्माण करणे, शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करणे, पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात दिशा देणे, तसेच सामाजिक विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने देणे हा त्यांचा छंद आहे..

अक्षय देवडे यांनी आपल्या पत्रकारितेतून ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, स्थलांतर तसेच सामाजिक आणि विकास विषयांवर सातत्याने सडेतोड भूमिका मांडली आहे. त्यांच्या लेखणीतून अनेक प्रश्नांना वाचा फुटली असून प्रशासनालाही अनेक वेळा कारवाई करावी लागली आहे.

ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या समस्या समाजासमोर आणून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे. या सन्मानामुळे दौंड तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्राला एक नवी प्रेरणा मिळाली असून, अक्षय देवडे यांच्या पुढील वाटचाली साठी विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या सन्मानामुळे त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून दौंड तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्या कार्याची प्रेरणादायी नोंद झाली आहे.